भारताचा पाकिस्तानला तडाखा   

लाहोर, कराची आणि सियालकोट प्रत्युत्तराने हादरले

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या कुरापती न थांबल्याने अखेर भारताने लाहोर, सियालकोटसह महत्त्वाच्या शहरांवर गुरूवारी रात्री हवाई आणि समुद्रामार्गे जोरदार प्रतिहल्ले केले. यामध्ये पाकिस्तानच्या फैसलाबाद, सरगोधा, मुलतान आणि सियालकोट शहरांमधील संरक्षण यंत्रणा उद्ध्वस्त झाल्या. त्यामुळे पाकिस्तान हादरुन गेला आहे. दरम्यान, दोन्ही देशांनी शांतता राखावी, संयम राखावा असे आवाहन अमेरिकेने दोन्ही देशांना केले आहे.
 
सलग दुसर्‍या दिवशी पाकिस्तानने सीमेपलीकडून गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा करतानाच ड्रोन आणि क्षेपणास्त्रचा मारा केला. भारताने पाकिस्तनचा हल्ला परतावून लावतानाच त्यांची अनेक विमाने पाडली. तसेच ड्रोन आणि क्षपणास्त्रे निष्क्रीय केली. 
 
भारताच्या प्रत्युत्तरानंतर इस्लामाबाद, लाहोर, कराची, बहावलपूरसह अनेक शहरे हादरुन गेली. इस्लामाबाद, कराची, बहावलपूरमध्ये रात्रभर सायरनचे आवाज ऐकू येत होते. तसेच या शहरांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. भारताच्या प्रतिहल्ल्यानंतर पाकिस्तानच्या अनेक भागांत ब्लॅकआऊट करण्यात आले. व्याप्त काश्मीर पूर्ण अंधारात गेले, तसेच इस्लामाबाद, कराची, सियालकोट, लाहोरमध्ये ब्लॅकआऊट करण्यात आले.

पाकिस्तानचे आठ ड्रोन पाडले 

पाकिस्तानने भारताच्या दिशेने ८ ड्रोन सोडले होते. पाकिस्तानचे ड्रोन भारतीय लष्कराने हाणून पाडले. सतवारी, सांबा, आरएस पुरा, अरनियामध्ये पाकचे ड्रोन पाडण्यात आले. भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने पाकला चांगलाच दणका दिला.  

अमेरिकेची मध्यस्ती करण्याची तयारी 

भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी यूएस सेक्रेटरी मार्को रुबियो यांच्याशी संवाद साधला. परिस्थिती चिघळू देऊ नका, असे आवाहन अमेरिकेने केले. तसेच भारत-पाकिस्तानमध्ये मध्यस्थी करण्याची तयारी अमेरिकेने दर्शवली आहे. 

पाकिस्तानची तीन विमाने पाडली, पायलट ताब्यात

पाकिस्तानी हवाई दलाने भारतीय हद्दीत घुसून हल्ले करण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय सैन्याने पाकची तीन लढाऊ विमाने पाडली. भारताने पाडलेल्या पाकिस्तानच्या लढाऊ विमानांमध्ये दोन जेएफ-१७ आणि एक एफ-१६ यांचा समावेश आहे. पाकिस्तानी लष्करी अधिकार्‍यानेच याबाबत कबुली दिली. सतवारी, सांबा, आरएस पुरामध्ये पाकिस्ताने मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न केला. दरम्यान पाकिस्तानचे सगळे हल्ले भारताने परतवून लावले. या कारवाईत एका विमानातील पाकिस्तानी वैमानिकाला पकडण्यात आल्याची माहितीही मिळत आहे. 

तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांसोबत पंतप्रधानांची बैठक 

पाकिस्तानने आत्मघाती ड्रोन आणि फायटर जेटद्वारे भारतावर हल्ला केल्यानंतर दिल्लीत संरक्षण मंत्र्यांनी सीडीएस आणि तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी चर्चा केली. 
 
दरम्यान, पाकिस्तानने जम्मू, श्रीनगर, राजौरी, उरी, पठाणकोट अशा सर्व ठिकाणी एकाचवेळी हल्ला केला. पण, प्रत्युत्तरासाठी तयार असलेल्या भारतीय लष्कराने पाकिस्तानला अक्षरश: धूळ चारली आहे. भारतीय सैन्याकडून तैनात करण्यात आलेल्या एस-४०० एअर डिफेन्स सिस्टीम, एल-७० आणि शिल्का या अँटी एअरक्राफ्ट गन्सने पाकिस्तानकडून डागण्यात आलेली क्षेपणास्त्रे आणि रॉकेट्स हवेतच नष्ट केली आहेत. तर भारतावर हल्ला करण्यासाठी आलेली पाकिस्तानची अत्याधुनिक एफ-१६ आणि जेएफ १७  विमानंही पाडण्यात आली आहेत.  एफ १६ आणि जेएफ-१७  ही विमाने चीनने पाकिस्तानला दिली होती. 

प्रत्येक हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देऊ : एस जयशंकर 

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी या सर्व घटनेवर युरोपियन युनियनचे सरचिटणीस काजा कल्लास यांच्याशी संपर्क करत सांगितले, की भारताने आपल्या कृतींमध्ये सावधगिरी बाळगली आहे. पण समोरुन होणार्‍या हल्ल्याला चोख प्रतिसाद दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट शद्बांत सांगितले. यासोबतच जयशंकर यांनी इटालियन समकक्षाशीही चर्चा करत भारताची भूमिका स्पष्ट केली.

आयपीएलचा सामना रद्द

धरमशाला : आयपीएल मधील प्लेऑफच्या दृष्टीने महत्त्वाचा सामना पंजाब किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स सामना खेळवला जात होता. स्पर्धेतील ५८ वा सामना धरमशालाच्या मैदानावर सुरू होता. पण अचानक हा सामना रद्द केल्याची माहिती समोर येत आहे. सुरक्षेच्या कारणास्तव दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सामना रद्द करण्यात आला. 
 

Related Articles